नागपूर :रायगड माझा
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. विधानसभेतील सर्व पक्षांच्या संख्याबळासह विचार करता आवश्यक तेवढेच उमेदवार सर्वच पक्षांनी जाहीर केले आहेत. त्यामुळे 11 जागांसाठी 11 उमेदवारांची नावे जाहीर झाली असून, निवडणूक बिनविरोध होईल असे निश्चित मानले जाते.यामुळे घोडेबाजाराला लगाम बसणार आहे.
या 11 जागांमध्ये सत्ताधारी भाजपच्या सर्वाधिक पाच, शिवसेना दोन, कॉंग्रेस दोन, राष्ट्रवादी कॉंग्रेस एक आणि शेकाप एक असे प्रतिनिधित्व मिळणार आहे. 11 जागांवर तेवढेच उमेदवार जाहीर झाल्याने या निवडणुकीच्या माध्यमातून घोडेबाजार व राजकीय कुरघोडीला लगाम लावण्यात सर्वच नेत्यांना यश आल्याचे मानले जात आहे.
भाजपकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे सहयोगी आमदार व मंत्री महादेव जानकर यांच्यासह भाई गिरकर, राम पाटील रातोळीकर, रमेश पाटील आणि नीलय नाईक यांना उमेदवारी घोषित केली आहे. शिवसेनेकडून विद्यमान आमदार अनिल परब व मनीषा कायंदे यांना पसंती दिली आहे.
कॉंग्रेसने शरद रणपिसे यांना पुन्हा संधी देत यवतमाळमधील गुलाम नबी आझाद यांचे कट्टर समर्थक वजाहद मिर्झा या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांना मात्र उमेदवारीपासून वंचित ठेवले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाबाजानी दुर्रानी यांची उमेदवारी घोषित केली आहे, तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शेकाप यांचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील हे आहेत.
11 जागांवर तेवढेच उमेदवार जाहीर झाल्याने या निवडणुकीच्या माध्यमातून घोडेबाजार व राजकीय कुरघोडीला लगाम लावण्यात सर्वच नेत्यांना यश आल्याचे मानले जात आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवारी अखेरचा दिवस आहे, तर 16 जुलै रोजी मतदान होणार आहे. पण अकराच उमेदवार मैदानात असल्याने मतदान होण्याची शक्यता नसल्याचा दावा करण्यात येत आहे.