नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन
सरकारी वेबसाईट्स इतक्या असुरक्षित आहेत की त्या कोणीही हॅक करू शकतात, हेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटसच्या हॅकिंग घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले.
‘सीईआरटी- इन’च्या माहितीनुसार, २०१४ मध्ये १५५, २०१५ मध्ये १६४, २०१६ मध्ये १९९ आणि २०१७ मध्ये १६१ सरकारी वेबसाईट्सवर हॅकर्सनी हल्ला केला आहे.
हॅकिंगच्या घटना वाढल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. हॅकर्स सरकारी माहिती चोरून त्याचा दुरुपयोग करत असल्याचे दिसून येत आहे.
ऑडिट करणे गरजेचे…
सायबर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणतीही सरकारी वेबसाईट्स तसेच ॲप्लिकेशनचे होस्टिंग करण्यापूर्वी त्याचे ऑडिट करणे गरजेचे आहे. हे ऑडिट नियमितपणे करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सीईआरटी- इन यांनी ५४ सायबर सुरक्षा संघटनांना हे काम दिले आहे. तरीही हॅकर्सकडून सायबर सुरक्षा यंत्रणा तोडून सरकारी माहिती चोरली जात आहे. याचाच अर्थ सुरक्षा उपाय कमजोर असल्याचे दिसून येते.